नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणाने देश हादरला; सीबीआयच्या तपासात कोट्यवधींचा घोटाळा उघड
देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट-यूजी २०२६ परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात नाशिक, पुणे, लातूर आणि राजस्थानसह विविध भागांतून अनेक संशयितांना अटक करण्यात आली असून, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) तपासाची व्याप्ती वाढवत आहे. तपासात मोठ्या आर्थिक व्यवहारांचा आणि संघटित रॅकेटचा पर्दाफाश झाल्याची माहिती समोर आली आहे.
नीट-यूजी २०२६ परीक्षा रद्द — पुनर्परीक्षा २१ जून २०२६ रोजी
तपासादरम्यान नाशिकमधील शुभम खैरनार आणि पुण्यातील धनंजय लोखंडे यांची प्रमुख नावे समोर आली आहेत. प्राथमिक माहितीनुसार, शुभमने प्रश्नपत्रिका सुमारे १० लाख रुपयांत खरेदी करून ती १५ लाख रुपयांत विकल्याचे उघड झाले आहे. या व्यवहारातून लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या रॅकेटमध्ये आणखी काही जण सहभागी असल्याची शक्यता तपास यंत्रणांनी वर्तवली आहे.
पेपर खरेदी : १० लाख रुपये | पेपर विक्री : १५ लाख रुपये | मोठ्या आर्थिक रॅकेटचा संशय
दरम्यान, राजस्थानमधील भाजप नेता दिनेश बिंवाल यालाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या घडामोडींनंतर काँग्रेसने भाजप सरकारवर गंभीर आरोप करत पेपर लीक माफियांना राजकीय संरक्षण मिळत असल्याचा दावा केला आहे. सीबीआयने विविध राज्यांमध्ये छापेमारी करून मोबाईल डेटा, आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे आणि इतर महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलत असल्याचेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही | आधीचे अर्जच वैध राहणार | नवीन प्रवेशपत्र लवकरच उपलब्ध
पेपरफुटीच्या आरोपांनंतर केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) यांनी ३ मे रोजी झालेली नीट-यूजी २०२६ परीक्षा रद्द केली आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून पुनर्परीक्षा २१ जून २०२६ रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती एनटीएने दिली आहे.





