

“सकारात्मक वृत्ती आणि विधायक दृष्टी ठेवल्यास महिला यशाला गवसणी घालू शकतात” — नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ईगल फौंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय ‘रणरागिणी’ पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. कवी केशवसुत स्मारक, मालगुंड (जि. रत्नागिरी) येथे आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे यांनी महिलांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, ईगल फौंडेशनच्या नावाप्रमाणेच अनेक स्त्रिया आज विविध क्षेत्रांत गरुडझेप घेताना दिसत आहेत. शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, राजकीय आदी क्षेत्रांत महिलांनी अत्यंत जबाबदारीने काम केले असून बचत गटांसारख्या माध्यमातून त्या सक्षम होत आहेत. सकारात्मक वृत्ती आणि विधायक दृष्टी ठेवून महिलांनी वाटचाल केली तर त्या निश्चितच यशाला गवसणी घालू शकतात, असे त्यांनी सांगितले.
यावेळी डी. वाय. एस. पी. राधिका फडके यांनीही महिलांनी कोणतेही क्षेत्र असो, प्रभावीपणे आणि सक्षमपणे काम करून आपल्या कार्याचा ठसा उमटवावा, असे आवाहन केले. कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष श्री. गजानन पाटील यांनी महिला दिनाचा इतिहास आणि त्याचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली. स्त्रिया सक्षम झाल्या तर प्रत्येक घर आणि पर्यायाने देशही सक्षम होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. जि. प. सदस्या सौ. नेत्रा नवनीत ठाकूर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात सौ. वैदही रानडे (रत्नागिरी), श्रीमती शैला गंगाधर बैसाणे (जळगाव), सौ. भाग्यदेवी बाबुराव चौगले (सांगली), सौ. प्रियांका अविनाश नाईक (मुंबई), प्रा. सौ. सुमेधा सावळ (सिंधुदुर्ग), सौ. रुपाली विक्रम यादव (शिराळा), सौ. सुनिता विजय अरगडे (पुणे), श्रीमती सुनिता रविंद्र परमणे (कागल), शोभाताई निवृत्ती होनमाने (देवराष्ट्रे), प्रा. अश्विनी संजय पाटील (कराड), ॲड. स्नेहल भिमराव गुरव (कोल्हापूर), सौ. सुलक्षणा आनंदा कांदळकर (राधानगरी), सौ. सोनल संजोग खातू (रत्नागिरी), सौ. शुभांगी दामोदर कोंडे, डॉ. सुमिता संजय शिर्के, श्रीमती प्रमोदिनी विठ्ठलराव किनाके (यवतमाळ), सौ. वर्षा परशुराम ढेकणे आणि डॉ. कीर्ती ऋषिकेश कुलकर्णी यांना ‘रणरागिणी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कारप्राप्त महिलांना मानपत्र, सन्मानचिन्ह आणि कोल्हापुरी फेटा बांधून गौरव करण्यात आला. तुतारीच्या निनादात कार्यक्रमाला विशेष उत्साह प्राप्त झाला.
यावेळी पत्रकार वैभव पवार, पत्रकार उदय महाकाळ, श्री संकेत ढवळे, सामाजिक कार्यकर्ते श्री संजय शितप, पत्रकार संतोष बांधिवडेकर आदी मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करणारे श्री. हनुमंत कदम यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यास ईगल फौंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर, उपाध्यक्ष सागर पाटील तसेच पदाधिकारी श्री. प्रकाश वंजोळे, श्री. बाबासाहेब राशिनकर, श्री. दीपक पोतदार, पत्रकार श्री. दिनेश कांबळे, पत्रकार श्री. विजय जगताप, पत्रकार श्री. वैभव पवार, मुख्याध्यापक पांडुरंग नाईक, ईगल न्यूजच्या संपादिका सौ. शालन कोळेकर, सौ. पुष्पावती वंजोळे, सौ. सुलक्षणा राशिनकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.





