विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची विद्यार्थ्यांना कडक सूचना

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळने दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना कडक इशारा दिला आहे. उत्तरपत्रिकेत कोणत्याही प्रकारे स्वतःची ओळख दर्शविल्यास संबंधित विषयाची संपादनूक रद्द करून परीक्षार्थी अनुत्तीर्ण ठरविण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे व्यापक जनजागृती करत विद्यार्थ्यांनी परीक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
उत्तरपत्रिकेत ‘ओळख’ म्हणजे गंभीर गैरमार्ग
शिक्षासूचीत नमूद केल्याप्रमाणे खालील बाबी आढळल्यास ती गंभीर चूक समजली जाणार आहे :
- नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, शाळा किंवा गावाचे नाव लिहिणे
- ठरलेल्या जागेशिवाय बैठक क्रमांक नमूद करणे
- विशिष्ट चिन्ह, खुणा, कोड, रेखाचित्र किंवा संदेश लिहिणे
- परीक्षकाला उद्देशून विनंती, शुभेच्छा किंवा संदेश देणे
- ओळख पटेल अशी कोणतीही खूण करणे
अशा प्रकारच्या कृतींमुळे संबंधित विषयाची संपादनूक थेट रद्द केली जाईल.
३२ प्रकारच्या गैरमार्गांवर शिक्षेची तरतूद
मंडळाने जानेवारी २०२० पासून सुधारित “परीक्षार्थी गैरमार्ग – शिक्षा सूची” लागू केली आहे. या सूचीत परीक्षा पूर्व, परीक्षा कालावधी आणि परीक्षोत्तर अशा तीन टप्प्यांतील एकूण ३२ प्रकारच्या गैरप्रकारांचा आणि त्यावरील शिक्षांचा समावेश आहे.
- परीक्षा पूर्व गैरप्रकारांवरही कठोर कारवाई
परीक्षा सुरू होण्यापूर्वी घडणाऱ्या खालील प्रकारांवरही कडक शिक्षा होऊ शकते :
- बनावट कागदपत्रे सादर करणे
- अर्जात खोटी माहिती देणे
- चुकीचा फोटो किंवा ओळखपत्र वापरणे
- दुसऱ्याच्या वतीने परीक्षा देण्याचा प्रयत्न
- प्रश्नपत्रिका किंवा गोपनीय माहिती मिळविण्याचा प्रयत्न
अशा प्रकरणांमध्ये परीक्षेत बसण्यास प्रतिबंध किंवा दीर्घकालीन बंदी लागू शकते.
परीक्षा कालावधीत आढळणारे प्रमुख गैरमार्ग
- कॉपी करणे किंवा मदत करणे
- चिट, नोट्स, मार्गदर्शिका किंवा इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर
- प्रश्नपत्रिकेची देवाणघेवाण
- संकेत देणे किंवा गोंधळ निर्माण करणे
- उत्तरपत्रिका फाडणे किंवा नष्ट करणे
या प्रकारांमध्ये विषय रद्द, संपूर्ण परीक्षा रद्द किंवा पोलिसांत गुन्हा दाखल होऊ शकतो.
परीक्षोत्तर गैरप्रकारही तितकेच गंभीर
- उत्तरपत्रिका अनधिकृतपणे सोबत नेणे
- उत्तरपत्रिकेत फेरफार करणे
- इतरांकडून उत्तर लिहून घेणे
- परीक्षकांशी अनधिकृत संपर्क
- गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्रात बदल
अशा घटनांमध्ये विषय किंवा संपूर्ण परीक्षेची संपादनूक रद्द होऊ शकते.
सायबर व पोलिस कारवाईची तरतूद
प्रश्नपत्रिका लीक करणे, डिजिटल माध्यमातून गैरमार्ग, लाच देणे, उत्तरपत्रिकांमध्ये छेडछाड अशा गंभीर प्रकरणांमध्ये पोलिसांत गुन्हा नोंदवून सायबर कायद्यान्वये कारवाई केली जाऊ शकते.
कॉपीमुक्त परीक्षेसाठी व्यापक मोहीम
कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाने मागील दोन वर्षांत कॉपीमुक्त परीक्षा घेण्यात उल्लेखनीय यश मिळवले आहे.
- प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्हीद्वारे निगराणी
- संवेदनशील केंद्रांवर ड्रोनद्वारे देखरेख
- भरारी व बैठकी पथके
- शिक्षासूचीचे प्रकट वाचन
- जागृती सप्ताह व व्हिडिओ संदेश
यंदाही मंडळाने विविध विषयांवर माहितीपर व्हिडिओ तयार करून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केले आहेत.
नकळत चूकही महागात पडू शकते
विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले,
“जागरूकतेमुळे गैरप्रकारांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. वर्षभर राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमुळे परीक्षा पूर्व व परीक्षा कालावधीत होणारे गैरप्रकार जवळपास संपुष्टात आले आहेत. आता परीक्षोत्तर गैरप्रकारही कमी व्हावेत यासाठी विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांसाठी स्पष्ट संदेश
दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता व निष्पक्षता राखण्यासाठी मंडळाने कठोर पण स्पष्ट नियम लागू केले आहेत. उत्तरपत्रिकेत ओळख दर्शविणे, अनधिकृत साहित्य वापरणे किंवा कोणताही गैरमार्ग अवलंबणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यास गंभीर धोका ठरू शकतो.
म्हणून विद्यार्थ्यांनी नियमांचे काटेकोर पालन करून प्रामाणिकपणे परीक्षा देणे हाच सुरक्षित व यशस्वी मार्ग असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.





