सांगलीच्या ‘इस्लामपूर’चे अधिकृत नामकरण ‘ईश्वरपूर’; केंद्राची अंतिम मंजुरी
सांगली (विशेष प्रतिनिधी):
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील महत्त्वाचे शहर असलेल्या इस्लामपूर चे नाव बदलून ‘ईश्वरपूर’ करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने (भारतीय सर्वेक्षण विभाग) अखेर अंतिम मंजुरी दिली आहे. यामुळे गेल्या चार दशकांपासूनची स्थानिक नागरिकांची मागणी पूर्ण झाली आहे.
राज्य सरकारने यापूर्वीच या नामकरणाला मंजुरी देऊन केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. आता केंद्र सरकारच्या मान्यतेमुळे इस्लामपूर हे शहर अधिकृतपणे ‘ईश्वरपूर’ या नावाने ओळखले जाणार आहे.
ऐतिहासिक मागणी पूर्ण:
इतिहासकारांच्या मते, आदिलशाही राजवटीच्या काळात या शहराला ‘इस्लामपूर’ हे नाव मिळाले होते, तर त्यापूर्वीचे त्याचे मूळ नाव ‘ईश्वरपूर’ होते. १९७० च्या दशकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि नंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९८६ मध्ये या नामांतराची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण झाल्याने शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला नवी ओळख मिळणार आहे.
कार्यालयीन बदल लवकरच:
केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर आता ‘ईश्वरपूर नगरपरिषद’ आणि ‘ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघ’ यासह सर्व शासकीय, निमशासकीय संस्था आणि कार्यालयीन स्तरावर तातडीने नामबदल करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
महाराष्ट्र सरकारने यापूर्वी औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) आणि उस्मानाबाद (धाराशिव) या शहरांचे नामांतर केले होते. आता ‘ईश्वरपूर’मुळे राज्यात नामांतराच्या मालिकेत आणखी एका शहराचा समावेश झाला आहे.





