भारताचा आशिया कप 2025 मध्ये ऐतिहासिक विजय, पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा
दुबई/नवी दिल्ली | 29 सप्टेंबर 2025 — दुबईच्या ‘रिंग ऑफ फायर’ स्टेडियमवर रंगलेल्या आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर 5 विकेट्सनी थक्क करणारा विजय मिळवत आशिया खंडातील आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं. या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन करत ट्विट केलं
“खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर. निकाल तोच – विजय. आपल्या क्रिकेटपटूंना हार्दिक शुभेच्छा
मोदी यांच्या या संदेशाने संपूर्ण देशभरात विजयाच्या जल्लोषात उत्साहाची भर पडली आहे. क्रिकेटप्रेमींनी रस्त्यांवर, घरोघरी आणि सोशल मीडियावर टीम इंडियाच्या खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव केला.
पाकिस्तानची सुरुवात चांगली, पण पडझड लवकरच
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने दमदार सुरुवात केली होती. साहिबजादा फरहान (57 धावा) आणि फखर झमान (46 धावा) यांनी धावसंख्येला आकार दिला, परंतु एकदा ही जोडी बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा डाव कोलमडला. संपूर्ण संघ केवळ 146 धावांत गुंडाळला गेला.
कुलदीप यादवची फिरकीचा कहर
भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव हा पाकिस्तानसाठी फारच धोकादायक ठरला. त्याने आपल्या 4 षटकांत 30 धावा देत 4 बळी घेतले. त्याला जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत चांगली साथ दिली.
तिलक वर्मा ठरला विजयाचा शिलेदार
भारताचा डाव काहीसा डळमळीत सुरू झाला. अभिषेक शर्मा, शुभमन गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव लवकर बाद झाले. मात्र तिलक वर्मा आणि संजू सॅमसनने संयमी भागीदारी करत डाव सावरला. सॅमसन बाद झाल्यावर शिवम दुबेने तिलकला चांगली साथ दिली. शेवटी रिंकू सिंगने विजयी फटका मारत सामना संपवला.
विजयानंतरचा वाद : ट्रॉफी न उचलण्याचा निर्णय
या सामन्यानंतर एक अनपेक्षित वाद निर्माण झाला. ट्रॉफी वितरण समारंभात भारतीय संघाने पीसीबी प्रमुख मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे समारंभ तब्बल 1 तास 16 मिनिटे उशिरा पार पडला आणि अखेर भारतीय संघाने ट्रॉफी न उचलताच मैदान सोडलं. ही घटना क्रीडा क्षेत्रात चर्चेचा विषय ठरली.
देशभरात जल्लोष, राजकीय आणि क्रीडाविश्वातूनही कौतुक
पंतप्रधान मोदी यांच्यानंतर अनेक नेत्यांनी आणि माजी क्रिकेटपटूंनी टीम इंडियाचे कौतुक केलं. देशभरातील नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात विजय साजरा केला. पंतप्रधानांच्या शब्दांनी संघातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळालं असून हा विजय राष्ट्राभिमानाचा आणि सांघिक समर्पणाचा प्रतीक ठरला आहे.
भारताने आशिया कप जिंकला
तिलक वर्मा: 69* (53 चेंडू) – 3 चौकार, 4 षटकार
शिवम दुबे: महत्त्वाची अर्धशतकी भागीदारी
रिंकू सिंग: निर्णायक विजयी फटका
विजेता संघ: भारत
मॅन ऑफ द मॅच: तिलक वर्मा (69* धावा)
सर्वोत्तम गोलंदाज: कुलदीप यादव (4/30)
स्थळ: दुबई, रिंग ऑफ फायर स्टेडियम
निकाल: भारत 5 विकेट्सने विजयी





