“लोकसहभाग योजना अभियान 2025-26: ग्रामविकासासाठी सर्वांचा सहभाग”
पंचायती राज मंत्रालय 2 ऑक्टोबर 2025 पासून “लोकसहभाग योजना अभियान 2025-26” अंतर्गत “सबकी योजना, सबका विकास” ही मोहीम देशभर राबवणार आहे. या उपक्रमाचा उद्देश 2026-27 या आर्थिक वर्षासाठी समन्वित, पुराव्यावर आधारित आणि सहभागी पंचायत विकास योजना (PDPs) तयार करणे आहे.
2018 पासून सुरू झालेल्या या अभियानामुळे स्थानिक प्राधान्यांनुसार योजना तयार होऊन राष्ट्रीय उद्दिष्टांशी सुसंगत विकास घडवण्यास मदत झाली आहे. विशेष ग्रामसभा बैठकांद्वारे नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवण्यात आला आहे. eGramSwaraj पोर्टलनुसार, 2019-20 पासून 18.13 लाखांहून अधिक PDPs अपलोड करण्यात आल्या आहेत. 2025-26 साठी आतापर्यंत 2.52 लाख योजनांची निर्मिती झाली आहे.
26 सप्टेंबर 2025 रोजी अतिरिक्त सचिव सुशील कुमार लोहनानी यांच्या अध्यक्षतेखाली राज्ये, केंद्रशासित प्रदेशे आणि संबंधित संस्थांशी ऑनलाईन बैठक घेऊन अंमलबजावणी धोरणावर चर्चा झाली. मंत्रालयाने 20 केंद्रीय विभागांना विशेष ग्रामसभांमध्ये सक्रीय सहभाग सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.योजनांच्या तयारीसाठी राज्यांना नोडल अधिकारी नेमणे, प्रशिक्षण, ग्रामसभा वेळापत्रक निश्चित करणे आणि सार्वजनिक माहिती फलक लावण्याचे निर्देश दिले आहेत.
या मोहिमेत eGramSwaraj, Meri Panchayat App, Panchayat NIRNAY आणि SabhaSaar या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून पारदर्शक, जबाबदार आणि प्रभावी योजना प्रक्रिया राबवली जाणार आहे. आदिवासी सक्षमीकरणावरही विशेष भर दिला जाईल. हा उपक्रम ग्रामीण भारतात सेवा वितरण सुधारण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.





