माथेरानमध्ये रिक्षा चालकांचे न्यायासाठी आमरण उपोषण; आज तिसरा दिवस

सत्याचा शिलेदार” वार्तापत्राचे पत्रकार चंद्रकांत काळे यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा
सर्व परवानाधारक रिक्षाधारकांना ई-रिक्षा देण्याची मागणी; आंदोलन तीव्र, प्रशासनावर तोडगा काढण्याचा वाढता दबाव
निसर्गरम्य माथेरान येथील प्रमुख वाहतुकीचे आकर्षण असलेल्या हातरिक्षा सेवेला ब्रिटिशकालापासूनचा इतिहास आहे. माथेरानचा शोध लागल्यापासून येथील लाल मातीच्या रस्त्यांवर घोडे आणि हातरिक्षा चालत आल्या आहेत. मात्र काळानुसार परिवर्तन आवश्यक असल्याने, माणसाने माणसाला ओढण्याची अमानुष प्रथा बंद करून पर्यावरणपूरक ई-रिक्षा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
नगरसेवक सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने माथेरानमध्ये सध्या २० ई-रिक्षा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र एकूण ९४ परवानाधारक रिक्षाधारक असून, उर्वरित हातरिक्षा चालकांनाही ई-रिक्षा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी त्यांनी वारंवार प्रयत्न केले आहेत. न्याय मिळावा यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंतही धाव घेतली आहे.
या मागण्यांसाठी हातरिक्षा चालकांनी २३ मार्च २०२६ पासून आमरण उपोषण सुरू केले असून, मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस असून, चार उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर योग्य तोडगा काढण्यासाठी माथेरान नगर परिषदेचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी, नगरसेवक सोहेल महापुळे, सुनील शिंदे, मराठा समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव, चर्मकार समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते जगदीश साळुंखे तसेच पत्रकार गिरीश पवार आणि इतर मान्यवरांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या.






