ग्रहण, भद्रा आणि होळी २०२६ : होलिका दहनाबाबत
सत्याचा शिलेदार | महाराष्ट्र राज्य विशेष प्रतिनिधी डॉ. उमेश सुतार
फाल्गुन पौर्णिमेच्या निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या होळी आणि धुळवडीच्या तारखेबाबत यंदा पंचांगांमध्ये मतभेद दिसून येत आहेत. ग्रहण, भद्रा आणि तिथींच्या बदलत्या गणनेमुळे होलिका दहन २ मार्च की ३ मार्च, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
काही पंचांगांनुसार सोमवार, २ मार्च २०२६ रोजी प्रदोष व्यापिनी पौर्णिमा असल्याने सायंकाळी ६:१९ ते ८:३० या वेळेत होलिका दहन करण्याचा मुहूर्त दिला आहे. कालनिर्णय, लाला रामस्वरूप कॅलेंडर तसेच मध्य भारतीय पंचांगांमध्ये २ मार्चची नोंद आढळते. काही कॅलेंडरमध्ये रात्री उशिरा ‘भद्र पूंछ’चा मुहूर्त ग्राह्य धरून २ मार्चचा उल्लेख करण्यात आला आहे.
मात्र दुसऱ्या गटातील विद्वानांच्या मते, २ मार्च रोजी पौर्णिमेसोबत भद्रा प्रारंभ होत असल्याने त्या दिवशीचा प्रदोषकाळ बाधित ठरतो. तसेच ३ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ६:४६ वाजेपर्यंत चंद्रग्रहणाचा सुतक काळ राहणार असल्याने सुतक समाप्तीनंतरच पूजन व दहन करणे श्रेयस्कर ठरते, असे मत व्यक्त केले जात आहे.
मंगळवार, ३ मार्च रोजी सकाळी भद्रा काळ समाप्त होत असल्याने संध्याकाळचा प्रदोषकाळ भद्रामुक्त राहतो. जरी त्या दिवशी सायंकाळी पौर्णिमा तिथी समाप्त होत असली, तरी प्रदोषकाळाला प्राधान्य देत होलिका दहन करावे, असा सल्ला अनेक ज्योतिषांनी दिला आहे. त्यामुळे ३ मार्च रोजी सूर्यास्तानंतर होलिका दहन आणि ४ मार्च रोजी धुळवड साजरी करण्याचा कल अधिक दिसून येत आहे.
ऋषिकेश पंचांग व वाराणसी पंचांग यांनी ३ मार्चची नोंद केली असून, स्थानिक सूर्यास्ताची वेळ आणि भद्रा गणना यांमुळे तारखांमध्ये फरक पडत असल्याचे सांगितले जाते.
यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असला तरी, स्थानिक परंपरा व पंचांगानुसार निर्णय घ्यावा, असे आवाहन विद्वानांकडून करण्यात आले आहे.





