‘जावे विनोदाच्या गावा’ कार्यक्रमात मराठी ज्ञानभाषेचा निर्धार
मुंबई, दि. २७ : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात ‘जावे विनोदाच्या गावा’ या विशेष कार्यक्रमाने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला ज्ञानभाषेच्या स्तरावर नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
मुख्यमंत्री म्हणाले, जगात ज्या भाषा व्यवहार, रोजगार आणि ज्ञानाशी जोडल्या जातात त्या पुढे प्रवाहित होतात. त्यामुळे अभिजात दर्जा लाभलेल्या मराठी भाषेला ज्ञानभाषेत रूपांतरित करून ती अधिक समृद्ध स्वरूपात पुढील पिढीकडे देणे ही आपली जबाबदारी आहे.
मराठी भाषेच्या अभिमानाचा इतिहास सांगताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख केला. “त्या काळात प्रशासनात फारशी व अरबी भाषेचे प्राबल्य असताना मराठी शुद्धीकरणासाठी शब्दकोश निर्मितीचे कार्य शिवाजी महाराजांनी केले. मराठी अभिमानाची सुरुवात त्यांच्यापासूनच झाली,” असे त्यांनी सांगितले.
विधानमंडळातील कामकाज हे साहित्यनिर्मितीला चालना देणारे असून अनेक चित्रपट व नाटकांना येथून विषय मिळतात, असे नमूद करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल गौरव केला. मराठी साहित्य, लोककला आणि संस्कृती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमास विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, डॉ. नीलम गोऱ्हे, अण्णा बनसोडे, चंद्रकांतदादा पाटील, आशिष शेलार, आशुतोष काळे आणि जितेंद्र भोळे आदी मान्यवर उपस्थित होते. मराठी अभिमानाने विधानभवन परिसर दुमदुमून गेला.





